समस्त मानव जातीच्या कलात्मक उत्क्रांतीवर प्रकाश झोत टाकणारी. तत्कालीन भूरचना, हवामान, प्राणी जगत, मानवी अस्त्तिव व मानवी जीवनाचा विकास, प्रगती यावर भाष्य करणारी. आणि भवितव्याचा वेध घेण्यास मदत करणारी कातळशिल्प आज मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य जनतेसाठी चर्चेचा एक विषय बनली आहेत. त्याबाबत खूप मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चर्चेचे निमित्त राजापूर तालुक्यातील बारसू , सोलगाव, गोवळ परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प आणि त्या परिसरात असलेली कातळशिल्प
एकीकडे निसर्गपूरक शास्वत जीवनशैली. ज्या जीवनशैलीत मानवी मूल्यांना तसेच ज्यावर मानवी जीवन अवलंबून आहे त्या निसर्गाला अपरंपार महत्त्व आहे. तर दुसरीकडे पूर्णपणे परावलंबी असलेली पैसा म्हणजे विकास मानणारी, मानवी जीवन मूल्यांना कस्पटासमान लेखणारी, यंत्रांच्या खडखडात एक यंत्र बनून गेलेली जीवनशैली. मग या दोन भिन्न विचारसरणीतून रिफायनरी सारख्या विषयात संघर्ष होणे अटळ होते आणि तेच चालू आहे. अशा वेळी त्यामध्ये राजकारण नाही आले तर नवल.
अलीकडे या राजकीय संघर्षात महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांनी बारसू परिसरातील कातळशिल्प आणि त्यांचे महत्व या विषयाला सार्वजनिक तोंड फोडलं. परंतु असे का? हा निव्वळ राजकीय विषय आहे की त्याला आणि काही पैलू देखील आहेत? माझ्या दृष्टीने या दुसऱ्या पैलूंना अधिक महत्व आहे.
मा. श्री उध्दव ठाकरे रिफायनरीच्या निमित्ताने राजापूर परिसरात आले होते. त्यांच्यातील कलासक्त विचार त्यांना बारसू परिसरातील कातळशिल्प पहाण्यासाठी घेऊन आला. या भेटी दरम्यान त्यांचे सोबत असलेली मंडळी अनावधाने थेट कातळशिल्पावर वावरत होती. हे पाहून त्यांनी सर्वांना “तेथून बाजूला व्हा, हा आपला समृध्द वारसा ठेवा आहे त्याचा आदर करा असे ठणकावून सांगितले.” ज्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यावेळी या विषयात मला परिपूर्ण माहिती नाही त्यामुळे सोबत असलेल्या अभ्यासकांना याबाबत प्रश्न विचारा हे नम्रपणे सांगितले. खरे म्हणजे आजूबाजूला 50 /60 जण उपस्थित असताना त्यांच्या मनात, वागण्यात कातळशिल्प महत्व आले नाही. तेच श्री उध्दव ठाकरे यांनी कातळशिल्प रचनांचे महत्त्व जाणणे हे राजकारणाच्या पलीकडे आहे.
त्याच दिवशी संध्याकाळी श्री राज ठाकरे यांनी जाहीर सभेत कातळशिल्प हा विषय उचलून धरला. हा विषय मांडताना त्यानी कातळशिल्पांचे जागतिक स्तरावरील महत्व स्पष्ट केले. अत्यंत पोटतिडकीने त्यांनी कातळशिल्प हा विषय त्या प्रती सर्वसामान्य माणसांचे आणि शासनाचे दायित्व मांडले. कलेप्रती त्यांचे असलेले प्रेम त्यांचा सादरीकरणातून प्रकर्षाने जाणवले. यात कोठेही आम्हाला राजकारण जाणवले नाही.
या मंडळींनी मांडलेल्या विषयाला प्रतिसाद देताना महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा. ना. श्री उदय सामंत यांनी प्रकल्प जागेतील कातळशिल्प आणि परिसर जपण्यास प्राधान्य असेल असे जाहीर केले. त्यांची ही भूमिका राजकीय उलथापालथीतून जन्माला आलेली नाही. अगदी सुरवातीपासूनच त्यांनी ही भूमिका मांडली आहे जी राजकारणाच्या पलीकडे आहे.
गेली काही वर्ष कातळशिल्पांचे महत्त्व आम्ही घसा फोडून सांगत आहोत त्याकडे कोणी लक्ष दिले नाही पण हीच कातळशिल्प युनेस्कोच्या दारात धडकल्यानंतर, त्याचे महत्त्व लक्षात आले हे दुर्दैव आहे. ही आम्हा भारतीयांची नकोशी मानसिकता आहे. असो
या घटनांच्या निमित्ताने कातळशिल्पांचा शासन प्रशासन पातळीवरील प्रवास मांडणे ओघाने आलेच.
सन 2012 पासून खऱ्या अर्थाने कोंकणातील कातळशिल्प हा विषय सार्वत्रिक पातळीवर आणण्यास आम्ही सुरुवात केली. त्यावेळेचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री राधाकृष्ण बी यांनी कातळशिल्प परिसरातील चिरा खाणीवर नियंत्रण आणुन संवर्धनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले, तत्कालीन जिल्हा परिषद सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांनी कातळ शिल्प परिसर ग्रामीण पर्यटन विकास योजनेत आणून कातळशिल्प पर्यटन विकासाच्या दृष्टीने पाहिले पाऊल उचलले. दरम्यानच्या काळात तत्कालीन कोकण विभागीय आयुक्त श्री जगदीश पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेला कातळ शिल्पांचे महत्त्व सांगितले येथ पासून आजतागायत प्रशासकीय यंत्रणेचे उत्तम सहकार्य कातळशिल्पांना लाभले आहे. (अर्थात हे व्यक्ती सापेक्ष आहे) श्री तेजस गर्गे, संचालक महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग तसेच सांस्कृतिक कार्य मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. त्यांच्यामुळे आज कातळशिल्प ठिकाणांना राज्य संरक्षण पुरविणे, जागतिक स्तरावर मान्यता मिळणेसाठी प्रयत्न करणे, अधिक सखोल संशोधनासाठी प्रयत्न करणे याबाबी सातत्याने चालू आहेत. या सर्व बाबींना राजकीय पाठबळ लाभणे आवश्यक असते. काही प्रमाणात हे सहाय्य सुरवातीपासून लाभत आहे. मा. ना. श्री उदय सामंत, मा. आमदार श्री राजन साळवी यांचे सहकार्य सातत्याने लाभत आहे. वरिष्ठ पातळीवरून मा. श्री उद्घव ठाकरे, मा. श्री अमित देशमुख यांनी कातळशिल्प संरक्षण संवर्धन तसेच युनेस्को वारसा स्थळ दर्जा मिळणेसाठीच्या प्रवासाला गती दिली त्याला केंद्र शासनाचे बळ मिळाले. त्यामुळे आज कातळशिल्प ठिकाणे युनेस्को जागतिक वारसा स्थळ प्राथमिक यादीत समाविष्ट झाली आहेत. अर्थात त्यामागे कातळशिल्पानां असलेले वैश्विक मूल्य कारणीभूत आहेच. पुढच्या टप्यात मा. ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांचे अप्रतिम सहकार्य लाभत आहे. आम्ही आग्रहाने मांडलेल्या विषयाला मान देऊन कातळशिल्प ज्या जागेत आहेत त्या जागा मालकांचे हित हेतू जपत कातळशिल्प संरक्षणाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. जागा मालकांचे हित, हेतू जपत कातळशिल्पांचे संरक्षण ही खूप मोठी गोष्ट आहे. खर तर ही एक मोठी संधी आणि उपलब्धी आहे. हे एकीकडे चालू असताना केंद्र शासनाने या विषयाच्या सखोल संशोधनाला सहकार्याचा हात पुढे केला आहे. अगदीच सांगायचे झाले तर शासन, प्रशासन पातळीवर राजकारणाच्या पलिकडे जाऊन कार्य चालू आहे. आणि पुढे असेच चालू राहील ही अपेक्षा.
अर्थात हे काही एका दिवसात झालेले नाही. गेली अनेक वर्ष आमचा सातत्यपूर्ण चालू असलेला प्रवास. विषय सक्षमपणे मांडण्याची धडपड, संघर्ष, संवाद व साद आणि प्रतिसादाची निष्पत्ती आहे. (विषय प्रसिद्धीस आल्यावर भूच्छत्रा सारख्या उगवलेल्या मंडळींचे यात योगदान निश्चितच नाही.) कातळशिल्प संवर्धन हा विषय इथून पुढे घेऊन जाणेसाठी, या निमित्ताने परिसराचा विकास साधण्यासाठी गरज आहे ती एका सूत्रबद्ध पद्धतीने माग्रकर्मणेची. जागा मालक, स्थानिक स्वराज्य संस्था, आणि स्थानिक मंडळींच्या सकारात्मक प्रतिसादाची. यातून कातळशिल्प ठिकाणांसोबत परिसराचे देखील संरक्षण, संवर्धन होणार आहे.
ज्या निमित्ताने हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे तो रिफायनरी प्रकल्प हा राजकारणाचा भाग कमी तर सामाजिक परिस्थितीतून जन्माला आलेल्या राजकीय अगतिकतेपोटी अधिक आहे असे जाणवते. ज्या अगतिकतेस सध्याची निसर्गापासून फारकत घेणारी जीवनशैली अधिक कारणीभूत आहे. हे विसरून चालणार नाही. त्याच बरोबर कितीही अगतिकता असली तरी शासन प्रशासनाने सामाजिक परिस्थिती, पर्यावरण यांचं बरोबर संबंधित परिसराची परिपूर्ण खरी खुरी माहिती करून घेणे तितकेच गरजेचे आहे आणि ती माहिती संबंधित यंत्रणेला करून देणे आपली प्राथमिकता. सध्याच्या PBR रजिस्टर सारखी निश्चितच नाही.
एक महत्वाचे लक्षात घ्यावयास पाहिजे आज आपण विविध मार्गाने विविध माध्यमातून व्यक्त होतो. मानवी इतिहासात ह्या स्वतःला व्यक्त होण्याची सुरुवात या खोद चित्रांच्या माध्यमातून झाली आहे. त्याचे माध्यम दगड म्हणजेच भूमी आहे ज्यामुळे आज आपण आहोत याचे भान आणि आदर प्रत्येकाने बाळगणे गरजेचे आहे.
सुधीर (भाई) रिसबूड.
(बारसू परिसरातील कातळशिल्प आणि अन्य बाबी पुढच्या लेखातून आपल्या समोर निश्चितच मांडणार आहे.)